राष्ट्रीय वागणूक माणुसकी...
- पुरुषोत्तम आवारे पाटील
सकाळ - नाशिक, पान ७
गुरुवार, 11 डिसेंबर 2014
आपल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गीता शताब्दी सोहळ्यात बोलताना गीतेला "राष्ट्रीय ग्रंथ‘ म्हणून घोषित करण्याची मागणी केली. स्वराजबाईंच्या या वक्तव्यावरून देशभरात वादविवादाची मोठी राळ उडाली आहे. सोशल मीडियावर असे विषय तत्काळ उमटायला लागतात. झालेही तसेच. यानिमित्त "भगवद्गीता‘ नव्याने समजावून सांगणाऱ्या दीड शहाण्यांच्या फौजा सामाजिक भिंतींवर उगवल्या आहेत.
गीता राष्ट्रीय ग्रंथ व्हावा, अशी मागणी पुढे आल्याबरोबर त्याची प्रचंड प्रतिक्रिया माध्यमातून उमटली. यानिमित्त शब्दांचे पिंजारी आपली सर्व शस्त्रे अन् शब्दसाठा घेऊनच मैदानात उरतले आहेत. गीता हा एका धर्मापुरता मर्यादित ग्रंथ असल्याने तो धर्मनिरपेक्ष देशाचा राष्ट्रीय ग्रंथ कसा काय होऊ शकतो? याची विविध अंगांनी मांडणी करणारा मजकूर माध्यमांतून ओसंडून वाहत आहे. या वादात अचानकपणे कुणीतरी "संविधान‘ ओढले. संविधान हाच आपला कसा राष्ट्रीय ग्रंथ आहे, याची तपशीलवार मांडणी करण्यात शेकडो विद्वान आपले बोरू खर्ची पाडत आहेत.
तसेही आपल्या देशातल्या मध्यम आणि उच्च मध्यम वर्गाला जगातल्या कोणत्याही विषयावर चर्चा करायला खूप आवडते. नॉन इश्यूवर चर्चा करण्यात लोकांना गुंतवून ठेवले की मूळ विषयाला, समस्यांना हवी तशी बगल देता येते, असा संस्कार आपल्या देशात हजारो वर्षे बहुजनांच्या मेंदूवर करून ठेवला आहे. सध्या आपण जे करीत आहोत, हा त्याचाच एक भाग आहे.
दिल्लीच्या गादीवर सध्या जो विचार बसला आहे, त्याचा "हिटलर‘ हा नेहमीच आदर्श राहिला आहे. या हिटलरच्या पदरी काम करणारा गोबेल्स हा त्याचा प्रचार मंत्री होता. देशातल्या जनतेसमोर खूप मोठे मूलभूत प्रश्न उभे राहिले की त्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हा गोबेल्स अशी काही क्लृप्ती काढत होता, की लोक मूळ प्रश्न विसरून काल्पनिक प्रश्नावर चर्चा करीत. एवढेच नव्हे, तर यावरून एकमेकांचे जीव घ्यायलाही तयार होत असत.
मला गीतेच्या राष्ट्रीय ग्रंथाची चर्चा त्या दिशेने जाणारी वाटते. मोठ्या अपेक्षेने आणि शंभरेक अशक्यप्राय घोषणा करून हे सरकार सत्तेवर आले आहे. सर्व शांत राहिले तर लोकांना देशातल्या मूळ प्रश्नांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. ती होऊ नये, यासाठी काय केले पाहिजे हे गोबेल्सने सांगून ठेवले आहे. सध्या घडणाऱ्या चर्चेच्या फैरी त्याचाच रियाज म्हटला पाहिजे.
काल्पनिक प्रश्न निर्माण करून आपल्या देशात राजकारण करण्याची फार मोठी परंपरा आहे. कॉंग्रेसने देशावर दीर्घकाळ राज्य केले. ते करताना त्यांनीही मोठ्या प्रमाणात काल्पनिक प्रश्नांवरून देशातले बलाढ्य समूह नाचवले अन् नागवलेदेखील. त्याचा पहिला बळी या देशातला मुसलमान समाज पडला. मुसलमानांना हिंदुत्व हा काल्पनिक शत्रू उभा करून ते कायम आपल्या वळचणीला कसे राहतील, याची व्यवस्था करून कॉंग्रेसने आपल्या अनेक पिढ्या त्यावर पोसल्या, हे विसरून चालणार नाही.
"इस्लाम खतरे में है‘ अशी आरोळी ठोकली की सारा मुसलमान कॉंग्रेसच्या छताखाली दीर्घकाळ एकवटत होता, हे आपण अनुभवले आहे. अलीकडे ही बदमाशी अनेक मुस्लिम नेत्यांच्या लक्षात आल्यावर मुसलमान जाणीवपूर्वक वेगळा झाला. पण, हे समजण्यासाठी एवढी दशके जावी लागली एवढी शक्ती काल्पनिक प्रश्नांमध्ये असते.
रामजन्मभूमीच्या काल्पनिक प्रश्नांवर संघ परिवाराने या देशाची पुन्हा फाळणी होते की काय, अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली होती. हे अजून आपल्या स्मरणातून डीलीट झाले नसावे, असे मला वाटते. आता हाच परिवार कधी नव्हे एवढे फाजील बहुमत घेऊन सत्तेवर आला आहे. खरं तर काल्पनिक प्रश्नांवर लोकांना लढविण्याचा आताच श्रीगणेशा झाला आहे, असे समजण्यास हरकत नाही.
काल्पनिक प्रश्न समाजमनावर फेकून त्याची तीव्रता मोजायची, त्यांना अपेक्षित परिणाम जाणवला की कार्यभाग व्यवस्थित उरकून घ्यावा असा हा सारा मामला आहे.
गीता हा राष्ट्रीय ग्रंथ जाहीर करण्याचा प्रश्न एवढा तापविला जाईल की आगामी काळात गीता की संविधान? यापैकी एकाची निवड करण्याचे मोठे आव्हान देशापुढे निर्माण करून समाजमन "सजेस्टेबल‘ करून ठेवायचे, असा कावा या मागणीमागे आहे, हे लपून राहिले नाही. जेव्हा गीता आणि संविधान यापैकी एकाची निवड करावी लागेल, त्या वेळी संघ परिवाराचा प्राधान्यक्रम काय असेल हे उभ्या देशाला सांगण्याची गरज आहे काय?
संविधानातल्या अनेक कलमांचा तसाही संघ परिवाराचा होणारा त्रास जुना आहे. तो कधीतरी परिवारातल्या विविध नेत्यांच्या तोंडून बाहेरही पडतो. अशावेळी ही मागणी लीटमस चाचणीसारखी वापरली जातेय, हेही लक्षात घेतले पाहिजे.
या मागणीच्या पार्श्वभूमीवर विचार करताना एक लक्षात येते, की जणू काही आपल्या देशातले सगळे प्रश्न संपले आहेत. गीता हाच एक जीवन-मरणाचा प्रश्न शिल्लक राहिला आहे. कोट्यवधींच्या समूहात काही फासे फेकण्यात संघ परिवार माहीर आहे. तो फासे फेकून मोकळा होतो. आपण त्यात अलगद अडकतो. काही जण तर अशा सापळ्यांची वाटच पाहत असतात. स्वतःहून ते अंगावर घेतात. यात परिवार जिंकतो, आपण हरतो.
धर्मनिरपेक्षता हीच परिवाराच्या डोळ्यांत सतत खुपणारी सल आहे. देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या ज्या काही पहिल्या पायऱ्या आहेत, त्यातली ही मागणी एक पायरी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. कवी सूर्यकांत डोळसे यांच्या ओळी मला आठवल्या,
"आपल्या राष्ट्राला म्हणे
नवा राष्ट्रग्रंथ हवा आहे?
याचा अर्थ मागणीकर्त्याला
धर्म सलोख्याचा अंत हवा आहे ।
कुजके विचार, सडके मेंदू
पोटात वळवळणारा जंत आहे
धर्मग्रंथांना वंदन करून सांगतो
संविधानच आपला राष्ट्रग्रंथ आहे ।
Comments
Post a Comment