Skip to main content

खरे खुरे आयडॉल ...पोपटराव पवार

खरे खुरे आयडॉल ...पोपटराव पवार

महाराष्ट्रातली अनेक गावं सध्या दुष्काळाचे चटके सोसतायत. हीच अवस्था नगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजार गावाचीही होती. पण हे गाव आता बाराही महिने हिरवंगार असतं. नियोजन, दुर्दम्य इच्छाशक्ति, अपार मेहनत, सामूहिक एकोप्याचं दर्शन घडवत गावकर्यांनी आपलं गाव नावारूपालाआणलंय…
हिवरे बाजार. अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यापासून 10 किलोमीटर अंतरावरील जवळपास तेराशे लोकवस्तीचं नि 976 हेक्टर क्षेत्रापर्यंत विस्तारलेलं एक गाव. दुष्काळाच्या झळा सातत्यानं सोसत दारिद्रय़ाच्या ऊन्हात अक्षरशः करपून गेलेलं एक खेडं. गावात पाण्याचा दुष्काळ. उजाड माळरानं. उघडे बोडके डोंगर. तळ गाठलेल्या विहीरी. ओसाड शेती. जागोजागी काटेर्या बाभळीची निष्पर्ण झुडपं. बेरोजगारीची जाणीव करूनदेणारी मातीची झोपडीवजा घरं नि नैराश्येत हरवलेले निस्तेज चेहरे, हीच जणू एकेकाळी हिवरे बाजार गावची नकारात्मक ओळख बनलेली.
अत्यल्प पावसामुळे प्यायला पुरेसे पाणी नाही. परिणामी, शेती नाही. रोजगार नाही. शिक्षण नाही. प्रगती नाही. अशाप्रकारे गावचा विकासच माजघरातल्या खुंटीला टांगलेला. घरातल्या बायाबापडय़ांची पाण्यासाठी मैलोन्मैल वणवण तर गावात मालकीची जमीन असूनही गावकर्यांची रोजगारासाठी आसपासच्या बडय़ा शहरांकडे केविलवाणी धाव. सारेच चित्र निरूत्साही.दारिद्रय़, गुन्हेगारी आणि दारू यांच्या अजगरी विळख्यात अडकलेल्या गावकर्यांची शरीरं पोखरत होती नि त्यांची दारुण अवस्था पाहून एम.कॉम. झालेल्या पोपट पवार नावाच्या एका नवतरुणाचं मनअधिकच अस्वस्थ होत होतं…
हिवरे बाजार गावाचं आजवरचं भयावह चित्र बदलंल पाहिजे, या जिद्दीनं हा तरुणअक्षरशः पेटून उठला. त्यानं प्रत्येक गावकर्याचं घर गाठलं. हिवरे बाजार गावच्या विकासाची पंचसूत्री त्यानं तयार केली नि ती प्रत्येकाच्या मनी बिंबवण्याचा प्रयत्न सुरू केला. ,उच्चविद्याविभूषित पोपट पवार या तरुणाचं म्हणणं मनोमन पटू लागलं. बघू या, हा तरुणकाय करतोय ते! असं म्हणून सार्या गावकर्यांनी पोपट पवार यालाच हिवरे बाजार गावचा सरपंच केलं. ही घटना 1989-90 दरम्यानची.
कोणतीही सुधारणा काही एका दिवसात घडत नाही. त्यालाही काही काळ जावा लागतो. मागील बावीस वर्षात खूप काही बदललंय. हिवरे बाजार गाव आणि तिथली माणसंही. महाराष्ट्रातील अनेक दुष्काळी गावात `समुद्री चहुकडे पाणी पिण्याला थेंबही नाही’ अशी अवस्था झालेली असताना, एकेकाळी दुष्काळाचे चटके सोसणारं हिवरे बाजार गाव आता `हिरवंगार’ बनलंय. दूरदर्शी नियोजन, दुर्दम्य इच्छाशक्ति, अपार मेहनत, सामूहिक एकोप्याचं दर्शन घडवित सार्या गावकर्यांनीच हिवरे बाजाराला नावारूपालाआणलंय. सार्या जगालाच गावानं स्वतःची नव्यानं आगळी ओळख करुन दिलीय. एक सुखीसंपन्न आदर्श गाव म्हणून घडवलंय
श्रमदान. कुर्हाडबंदी. चराईबंदी. दारुबंदी.कुटुंब नियोजन. या पंचसूत्रीच्या आधारे हिवरे बाजार गावचा कायापालट झालाय. उजाड डोंगर, माळरानांवर गावकर्यांच्या श्रमदानातून लहानमोठे चर खणण्यात आले. 56 नालाबंद, 2 मातीचे बंधारे, 7 कोल्हापूर बंधारे बांधले. पाझर तलाव निर्माण केले. जलसंधारणाचा धडक कार्यक्रम राबवला गेला. परिणामी, गावाचं पाणी गावातच अडलं. गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली. डोंगरदर्यात वृक्षारोपण जोमानं झालं. जमिनीची धूप थांबली. कुर्हाडबंदीनं, चराईबंदीनं पर्यावरणाचं रक्षण होऊन रानं हिरवी झाली. शेतीपंपांना वीज मिळू लागली. पशुखाद्य मुबलक उपलब्ध झालं. शिवार बहरलं. रोजगार, स्वयंरोजगारानं गावकर्यांच्या श्रमाला दाम नि प्रतिष्ठा मिळवून दिली. प्राथमिक शाळांनी माध्यमिक शाळेपर्यंत मजल मारली. प्रौढ शिक्षण वर्गाला नवा हुरुपआला. साक्षरतेनं 30 टक्क्यांवरून 95 टक्क्यांवर थेट भरारी घेतली. दरडोई उत्पन्नानं 832 रुपयावरून 30 हजार रुपयापर्यंत मजल मारली. गावातील विहीरींची संख्या 97 वरून284 वर गेली. इलेक्ट्रीक पंप 87 वरून 280 झाले. ओलिताखालील क्षेत्र 250 हेक्टरवरून600 हेक्टरपर्यंत विस्तारलं. शेतात ठिबक सिंचनाची टपटप सुरू झाली. गावात फुलशेती, कांदा, वाटाणा, डाळिंब, पालेभाज्यांचे भरघोस उत्पादन घेतलं जातंय. गाई-म्हशींची संख्या वाढून दूध उत्पादन प्रती दिन 140 लिटर्सवरून 5 हजार लिटर्सपर्यंत गेलंय. गावातील 95 टक्के शेती रासायनिक नव्हे तर सेंद्रिय खतावर केली जातेय. गोमूत्र, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस कीटकनाशक म्हणून शेतीत फवारला जातोय. हिवरे बाजार गावाच्या आदर्शाचा धडा अन्य गावांनी गिरवावा यासाठी लवकरच `ग्राम प्रशिक्षण केंद्र’ उभारण्यात येणार आहे. गावकर्यांच्या झोपडीवजा घरांच्या जागी हळूहळू बंगले, इमारती घेऊ लागल्यात.
हिवरे बाजारच्या 18 शेतकर्यांनी आपल्या जमिनी गावाला दिल्या. त्यातून नवं नियोजनबध्द गाव उभं राहिलंय. तिथं नव्या शाळा उभ्या राहिल्यात. खेळाच्या मैदानात विद्यार्थ्यांचा दम घुमू लागलाय. फुलांनी, मुलांनी उद्यानं बहरुलागलीत. रुग्णालंय रुग्णसेवा देतंय. पायवाटांनी कात टाकलीय. डेअरी विकास होतोय. फर्निचर, टेलरिंग उद्योग सुरुझालाय. महिला बचत गट सक्रिय झालेत. सहकार सोसायटय़ा उभ्या राहताहेत. मजुरांच्या कमतरतेवर मात करीत सामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वी झालाय. आदर्श गाव म्हणून मिळालेल्या विविध पुरस्कारांची ओळख मिरवणारी हिवरे बाजार ग्रामसंसदेची देखणी इमारत आता सार्यांचंच प्रबोधन करीत आहे. गावची पत वाढलीय. मनामनात साचलेलं नैराश्य जाऊन गावचा अभिमान आणि विश्वास जागृत झालाय.
हिवरे गावानं काही धाडसी निर्णय घेतलेत. विंधण विहिरींचं पाणी केवळ पिण्यासाठीच. विहिरींचं पाणी शेतीसाठी. गावात 199 मि.मी. पर्जन्यमान होतंय. पण, गावात एकूण किती पाऊस पडतो, हे पाहूनच पुढील पाणीवाटपाचे नियोजन करण्याचं ग्रामसभेत ठरलंय. गावात अधिक पाण्यावर पोसणार्या ऊस, केळीच्या उत्पादनावर बंदी आहे. जमीन गावाबाहेरच्या व्यक्तीला विकायची नाही. गावात गुटखाबंदी आहे. दारुबंदीआहे. विडी, सिगारेट, तंबाखू सेवनावरही बंदी आहे. 1992 पासून लग्नाच्या वराती, बेन्जो पाटर्य़ा बंद आहेत. `गावात एक गाव एक गणपती’, `एक कुटुंब, एक मूल’, `एक गाव एक पाणवठा’, एक गाव एक स्मशानभूमी’ या संकल्पना वास्तवात उतरल्यात. घरोघरी शौचालंय आहेत. गाव हागणदारीमुक्त आहे. गावात हिंदू-मुस्लिम एकोपा आहे. निवडणुकीत गावकर्यांना दारू,पैसा, पाटर्य़ा देण्याचा प्रयत्न करणार्या राजकीय नेत्यांना हिवरे बाजार गावात थारा नाही. ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होताहेत. सरकारी योजनांसाठी मिळणार्या पैशाचा सुयोग्य वापर केला जातोय. त्यात टक्केवारी नाही की भ्रष्टाचाराला वाव नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करूनगावाच्या सर्वांगीण विकासाचं आदर्शवत नियोजन करता येतं, हाच हिवरे बाजार ग्रामसभेचा मूलमंत्र आहे.

Comments

Popular posts from this blog

चावडी उद्योग मार्गदर्शन केंद्र

२५०+ व्यवसाय, उद्योग, धंद्यांचे मार्गदर्शन / प्रशिक्षण मिळवा मराठीत ------------------------------------------- खास स्वताचा उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या प्रत्येक नव उद्योजकासाठी. आपल्या घरच्या घरी लघु उद्...

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ------------------------------------------- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ( www.mced.nic.in ) ही संस्था शासनाच्या पुढाकाराने स्थापन झालेली आणि उद्योग विभागाच्या आधिपत्याखाली क...

वाया जाणाऱ्या ऊस पाचटा पासुन सुरु केला उद्योग

वाया जाणार्या ऊस पाचटा पासून सुरु केला उद्योग ------------------------------------------- शेतीपूरक उद्योग ही काळाची गरज असल्याचे ओळखून प्रवीण लंगोटे या तरुण अभियंत्याने उसाच्या पाचटापासून ब्रिकेट (कोळस...