चार्वाक दर्शन साभार - लोकसत्ता भारताच्या दार्शनिक इतिहासात अद्वितीय स्थान असलेल्या तर्कनिष्ठ आणि बुद्धिप्रामाण्यवादी चार्वाक दर्शनाला इतर सर्व दर्शनांनी - अगदी जैन व बौद्ध या नास्तिक दर्शनांनीसुद्धा तुच्छ लेखले. त्यांच्या युक्तिवादांना पटण्याजोगी उत्तरे देता येईनात म्हणून सर्वानी त्यांची यथेच्छ निंदा केली. शरद बेडेकर चार्वाकांची निंदा करण्याकरिता, ते अविचारी व भोगवादी होते, या मताचा पुरावा म्हणून वारंवार सांगितला जाणारा, ‘कर्ज काढूनही तूप प्या’ असे सांगणारा, चार्वाकांचा म्हणून सर्वदर्शन संग्रहात आलेला मूळ श्लोक असा आहे : यावत्जीवेत् सुखं जीवेत्, ऋणं कृत्वा घृतं पिबेत् भस्मीभूतस्य देहस्य, पुनरागमनं कुत:? म्हणजे जोपर्यंत जगायचे, तोपर्यंत सुखाने जगावे. कर्ज काढून तूप प्यावे. कारण भस्म झालेले शरीर पुन्हा कसे बरे परत येणार? काही अभ्यासकांचे म्हणणे असे आहे की, हा श्लोक चार्वाकांच्या नावाने घुसडण्यात आलेला आहे किंवा ‘ऋणं कृत्वा घृतं पिबेत्’ हा भाग तरी मूळ श्लोकात नसावा. याबाबत चार्वाक दर्शनाचे एक चिकित्सक अभ्यासक श्री. आ. ह. साळुंखे (ग्रंथ : आस्तिक शिरोमणी चार्वाक) यांची भूमिका अगदी व...